तसं तर आजकाल रोजच मंडई भरत असते. पण गुरुवार आणि रविवारच्या बाजाराची गोष्टच वेगळी आहे.आठवड्यात हे दोन बाजार अगदी भरगच्च भरतात. अगदी रसरसलेला माहौल असतो बाजार परिसरात. सकाळपासून हा माहौल जमायला सुरु होतो. पण खरा रंग चढतो दुपार नंतर. दररोज ची मंडई असून ही बाजारच्या या दोन्ही दिवशीही प्रचंड गर्दी भाजीपाला आणि इतर अनेक गोष्टी खरेदी करण्यासाठी होते. आसपासच्या खेड्यांमधुन शेतकरी त्यांचा माल घेऊन येतातच शिवाय लोकही खास बाजारासाठी येत असतात. बाजारात वेगवेगळ्या वेळी फिरणं हा एक भन्नाट अनुभव असतो. सकाळच्या वेळचा बाजार वेगळा दुपारचा वेगळा संध्याकाळी तर खूपच वेगळा असतो बाजार. बहुतेकदा संध्याकाळी चालत बाहेर पडत असतो तेंव्हा वेगवेगळ्या रस्त्याने फिरत असतो. पण बाजारच्या दिवशी मात्र बाजारच्या परिसराकडेच जावंसं वाटत. मग संध्याकाळच्या वेळेला ऐन भरात आलेला बाजार बघत फिरत राहतो. ती सगळी जिवंत दृश्य मनात साठत जातात. मग थोडावेळ रस्त्यापलीकडच्या दुकानाच्या पायरीवर उभं राहून तो बाजार बघण्यात जातो. बऱ्यापैकी अंधार पडलेला असतो. समोर तो नेहमीचा हलवेकरी आणि त्याचं भरगच्च दुकान बल्ब च्या उजेडात उजळलेलं दिसत असतं. चिरमुरे फरसाण, शेव,गोडीशेव पापडी, तऱ्हेतऱ्हेच्या मिठाया खाजा,बालुशाही, म्हैसूरपाक, बुंदीचे लाडू आणि काय काय बरंच.. असं सगळं भरगच्च...बाकी सगळा बाजार करून झाला की काही लोक त्या मिठाईवाल्या कडे वळतात..मग त्याच्याकडून काही मिठाईफरसाणचिरमुरे असं काहीतरी घेतल्यावर त्यांच्या बाजार प्रकरणाची सांगता होते. ते सगळं नुसतं बघत रहायला सुद्धा छान वाटतं.
मागे एकदा असंच संध्याकाळी बाजार बघत उभा होतो तर समोरच दिसणाऱ्या मिठाईवाल्याच्या दुकानाचं स्केच करावंसं वाटलं.
2021/25/3
No comments:
Post a Comment